आई माता मंदिर ते पुना मर्चंट चेंबर पूल बांधणे आवश्यक   

गंगाधाम चौकात हाईट बॅरियर लावून प्रश्न सुटणार नाही 

पुणे : गंगाधाम चौक ते आई माता मंदिर परिसरात सातत्याने अपघात होत आहेत. त्यात कोणताही दोष नसताना नागरिकांना प्राण गमवावा लागत आहे. त्यामुळे या परिसरातील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या भागात हाईट बॅरियर लावून प्रश्न सुटणार नाही, तर आई माता मंदिर ते पुना मर्चंटस् चेंबरपर्यंत उड्डाणपुल बांधणे आवश्यक असल्याची मागणी व्यापार्‍यांनी केली आहे.या रस्त्यावर वाढलेली वाहतूक कोंडी आणि तीव्र उत्तार आणि तीव्र चढ आदीमुळे या भागात सातत्याने अपघात होतात. वाहतूक कोंडी तर रोजचीच आहे. या भागात झालेले अपघात आणि त्यात मृत्यू झालेल्याची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या भागातील अपघात रोखण्यासह येथील वाहतूक कोंडी सोडविणे आवश्यक असल्याची भावना या भागातील नागरिकांसह व्यापार्‍यांनी केली. 
 
दिवसभर मोठ्या वाहनांना बंदी घाला 
 
खरे तर गंगाधाम चौकात मोठ्या गाड्यांना दिवसा बंदी आहे. मात्र दिवसभर मोठ्या गाड्या सर्रास ये-जा जातात. गाडीत लोड असल्यामुळे बर्‍याच वेळा तीव्र चढावर गाड्या मागारी येतात. तर काही वेळा तीव्र चढ चढत नाहीत. त्यामुळे गोंधळ होतो. यावर पर्याय म्हणून रात्री १० ते सकाळी ७ या वेळेत या रस्त्यावर मोठ्या वाहनांना प्रवेश देऊ नये. तसेच या चौकातील सिग्नल व्यवस्थेत बदल करावा. या चौकात चार पोलिसची नियुक्ती करावी आणि गतीविरोधकाची संख्या वाढविली पाहिजेत.  
 
प्रवीण चोरबेले, नगरसेवक. मार्केटयार्ड.
 
उड्डाणपुल हाच अपघात रोखण्याचा पर्याय 
 
गंगाधाम चौकात नुकत्याच झालेल्या अपघातात. एकाला प्राण गमवावा लागला. यापूर्वीही तेथे अनेक वेळा अपघात झाले आहेत. खालच्या बाजूस मार्केटयार्ड आहे, तेथे येण्यासाठी एकच रस्ता आहे. मार्केटयार्ड वरून शहराला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत असतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूस ३२-३२ मजल्याच्या भव्य बिल्डिंग उभ्या राहणार आहेत. आई माता मंदिर ते पुना मर्चंट चेंबर उड्डाण पुल बांधणे गरजेचे आहे. ही व्यापार्‍यांची अनेक दिवसांची मागणी आहे. पुल बांधल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे लवकरच पुल बांधणे गरजेचे आहे. त्याशिवाय येथील अपघात थांबणार नाहीत.
 
- वालचंद संचेती, अध्यक्ष, दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स 
 
पुलाची अनेक वर्षांपासून मागणी 
 
दि पुना मर्चंटस् बासून ते गंगाधामर्यंत उड्डाणपुल बांधण्याची गेल्या अनेक वर्षापासून आम्ही मागणी करत आहोत. या उड्डाणपुलाबाबत प्रशासनासी सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. जेव्हा सेव्ह चौक ते विजय धान्य भांडार असा उड्डाणपुल झाला त्या वेळीही तो पुल गंगाधाम चाकापर्यंत पुढे नेण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला होता. जर सेव्हन लव्ह चौक ते गंगाधाम चौक उड्डापुल झाल्यास खालच्या रस्त्यावरील वाहनांचा ताण कमी होईल. त्यातून वाहतूक कोंडी थांबेल. अपघातांनाही आळा बसेल. 
 
- रायजकुमार नहार, अध्यक्ष, दि पुना मर्चंटस् चेंबर. 
 
प्रशासनाने योग्य उपाय करावा
 
गंगाधाम चौकात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दोन ते तीन वेळा सिग्नल सुटल्यानंतर गाडी चौकातून पुढे जाते. त्यामुळे वाहतूक कोंडीला वैतागलेले वाहन चालक नियम मोडतात. गाडी जोरात चालवितात परिणामी अपघात होता. गंगाधाम चौकातून कोंढवा, बिबवेवाडी, मार्केटयार्ड आदी ठिकाणी गाड्या जातात. हा चौक आता शहराच्या मध्यभागी आला आहे. त्यामुळे या भागातून ये-जा करणार्‍या वाहनांची संख्या लक्षात घेऊन या चौकात मोठा उड्डाणपुल उभाण्याची गरज आहे. त्यामुळे चौकातील वाहनांची संख्या कमी होईल. 
 
- राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, फाम 

Related Articles